Friday, February 13, 2015

प्रेम : एक करणे

 'प्रेम म्हणजे नक्की काय असतं?' याचा उलगडा नीटसा न होताही प्रेम या संकल्पनेने आजवर जगात कथा, कविता, कादंबरी, नाटक, चित्रपट, चित्र, शिल्प, नृत्य आणि इतर स्वरूपात जे जे निर्मिलं आहे ते अजोड आहे. पुलंना उद्धृत करायचा मोह अनावर होतोय. 'माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे. आपलं दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. मग तो थेरडा असं काय करतोय? - या कालवाकालवीतून प्रेमकाव्य वाहिले.'  (पूर्ण मजकुरासाठी 'हसवणूक' पहावे. 'आमचा धंदा: एक विलापिका', पृ. ७) तर प्रेम ही एक कालवाकालव आहे असं ढोबळमानाने म्हटलं आणि हिंदी चित्रपटात तरी प्रेमकथेला कारण बनायचं मुख्य श्रेय मुलांच्या प्रेमाला नकार देणाऱ्या अनेक थेरड्यांना जातं हे खरं असलं तरी प्रेमकथा आकर्षून घेते खरी. आणि ती अगदी जमिनीवरची प्रेमकथा असेल (म्हणजे संजय भंसाळीची प्रेमकथा नसेल) तर त्याची बातच और आहे. चित्रपटात ज्यांच्या घराच्या नुसत्या दर्शनाने डोळे दिपतात अशांच्या प्रेमकथेबद्दल वैर असण्याचं काहीच कारण नाही, पण यश चोप्राच्या शिफॉन नेसलेल्या आणि स्वित्झर्लंडमध्ये बहरणाऱ्या छान प्रेमकथेपेक्षाही मुंबईतल्या लोकलमधून प्रवास करणारी, घराचे इएमआय जोडीने भरणारी प्रेमकथा अधिक जवळची वाटते. अलीकडेच 'छोटी सी बात' बघताना लक्षात आलं की आपण कितीही प्रयत्न केला तरी यशराजच्या हृतिक रोशन-ऐश्वर्या राय किंवा शाहरूख खान-माधुरी दीक्षित तर सोडाच, पण ऋषी कपू-श्रीदेवीशीदेखील आपण पटकन जोडून घेऊ शकत नाही. आपलं कनेक्शन जुळतं ते विद्या सिन्हा आणि अमोल पालेकरशी,  'कथा'मधल्या दीप्ती नवल-नसीरुद्दीन शहाशी, 'चष्मेबद्दूर' आणि 'साथ साथ'मधल्या फारूक शेख आणि दीप्ती नवलशी! अर्थात गंमत अशी आहे की यशराज किंवा धर्मा प्रॉडक्शनच्या चकचकीत चित्रपटांतील शाहरूख खानचा राहुल जरी फारसा जवळचा वाटला नसला तरी 'कभी हां कभी ना'मध्ये त्याच शाहरूख खानने रंगवलेल्या 'सुनील'शी मी कनेक्ट होऊ शकलो होतो. 

विचार करताना असं जाणवतं की एकूणातच प्रेम आणि प्रेमाचे आयाम कलाकृतीतून लोकांपर्यंत पोचवणं काहीसं अवघडच. चित्रपटही त्याला अपवाद नाही. आता जवळजवळ प्रत्येक हिंदी चित्रपटातून एक प्रेमकथा सांगितली जाते ते सोडा, पण प्रेम या संकल्पनेची वीण उलगडून दाखवणारे, त्यातून अनुभूतीचं वैविध्य देणारे चित्रपट विरळा. बरेचदा असंही होतं की प्रेमकथा हा मूळ विषय नसलेल्या चित्रपटातील प्रेमकथा स्पर्शून जाते, पण याच विषयावर बनलेला पूर्ण लांबीचा चित्रपट पकड घेऊ शकत नाही! 

मला प्रेमकथेबाबत श्याम बेनेगलचा 'सूरज का साँतवा घोडा' प्रकर्षाने आठवतो. धर्मवीर भारती यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झाला. माणिक मुल्ला (रजत कपूर) आणि त्याच्या आयुष्यातील तीन मुली यांची ही कथा आहे. या तिघींपैकी एक गरीब पण म्हणूनच करारी आहे, एक बुद्धीनिष्ठ, वाचनप्रेमी आहे आणि एक मध्यमवर्गीय, मध्यममार्गी आहे. या तिघींशी नायकाचे वेगवेगळ्या पातळ्यांवर आलेले संबंध आणि त्यातून घडलेली त्याची प्रेमाविषयीची भूमिका हे सगळं तो आपल्या मित्रांना सांगतोय. प्रेमालाही 'वर्गचरित्र' असतं हा यातला प्रमुख मुद्दा. आणि तीन प्रातिनिधिक कथांमधून तो फार प्रभावीपणे मांडला गेलाय. प्रेमाच्या 'देवदासीकरणाला' प्रश्न करणारा हा चित्रपट आवर्जून पाहावा असा आहे. 

दोघांमध्ये प्रेम निर्माण होणं आणि ते प्रेम प्रेक्षकांपर्यंत पोचवणं हे साध्य करणं जमू शकतं आणि मुळात प्रेम ही सर्वांच्या मनात असणारी, तरल भावना असल्याने ते बघणं आवडतंही, पण व्यावसायिक हिंदी चित्रपट प्रेमाकडे ज्या 'पॉप्युलर' दृष्टीने बघतो ती लक्षात घेता प्रेमाच्या बाबतीत काहीतरी मूलभूत बोलणारे, 'आणि ते सुखाने नांदू लागले'पेक्षाही प्रेमात असणाऱ्यांचं स्वतंत्र व्यक्तित्व आणि त्यांचं प्रेम यांचा मेळ कसा बसला, बसला का? ते इतर कुणाकडे ओढले गेले तेव्हा काय झालं? अशा खऱ्याखुऱ्या आव्हानात्मक प्रश्नांना सामोरे जाणारे चित्रपट बघणं काहीतरी ‘अधिक’ देतं. इथे फरक पडतो तो प्रेमाचं व्यक्तिकेंद्रित, व्यक्तीच्या बुद्धी-भावनांशी आणि व्यक्तीच्या एका परिघातील संघर्षाशी निगडीत असं चित्रण आणि भोवतालचं सामाजिक-राजकीय वास्तव जेव्हा सगळ्यांनाच ढवळून काढत असतं अशा परिस्थितीत, एका मोठ्या कॅनव्हासवर आपली जागा शोधणाऱ्या प्रेमाचं चित्रण, या दोन प्रकारांमध्ये. या दोन्हीचा समावेश असलेल्या जुन्या-नव्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर मला वर उल्लेख केलेल्या चित्रपटांबरोबर गोविंद निहलानीचा 'दृष्टी', बासु चॅटर्जींचा 'रजनीगंधा', गुलजारचे 'मौसम', 'इजाजत', रितुपर्णो घोषचा 'रेनकोट', इम्तियाज अलीचा 'सोचा न था', 'जब वी मेट',  'हायवे',  शाद अलीचा 'साथिया',  अभिषेक चौबेचा 'इश्किया', 'डेढ इश्किया' हे चित्रपट आठवतात. 

प्रेमकथा 'कालवाकालवीतून' वाहते हे खरं असलं तरी प्रेमाची मोहिनी जबरदस्त आहे हेही खरं. पडद्यावर पहिल्यांदा आलं तेव्हापासून आजवर 'त्या दोघांचं' प्रेम चालू आहे आणि राहीलच. आणि आजूबाजूचं पर्यावरण बदलत असताना ही दोघे एकमेकांत गुंतली आहेत आणि त्यांना काही काळापुरतं तरी इतर कुणीही नको आहे ही कल्पनाच एक स्वयंभू रोमँटिक अशी आहे!

(दिव्य मराठी, मधुरिमा)

No comments: