Wednesday, February 28, 2024

अ‍ॅनिमल, माणूस आणि सिनेमा

प्रास्ताविक 

सिनेमा हा एक अत्यंत प्रभावी कलाप्रकार आहे. (मी स्वतः सिनेमाचा मोठा चाहता आहे हेही सांगून टाकतो!). सिनेमाने जगभरातल्या लोकांवर गारुड करूनही आता बराच काळ लोटला. आज हे माध्यम फारच 'उत्क्रांत' झालं आहे. सिनेमाचं मुख्य वैशिष्ट्य हे की इथे अनेकविध कला एकत्र येतात. कथा लिहिण्यापासून सुरुवात होते आणि मग पात्रयोजना, अभिनय, छायाचित्रण, संवादलेखन, गीतलेखन, संगीत, ध्वनी, संकलन, इतर तांत्रिक बाजू आणि या माध्यमाचा सर्वात महत्त्वाचा भाग - दृश्य मांडणी – यांचे विविध आविष्कार एकत्र बांधून एक सलग कलाकृती आपल्यासमोर येते. या माध्यमाने आज इतकी तांत्रिक प्रगती केली आहे की सिनेमातून एक प्रतिसृष्टी निर्माण होऊ शकते. हॉलीवूडचे काही चित्रपट, मालिका याची साक्ष देतात. लेखक, कवी, चित्रकार म्हणून काम करणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाला आपण एखादा सिनेमा केला पाहिजे किंवा एखाद्या सिनेमाचा भाग बनलं पाहिजे असं वाटत असतं. सिनेमाबद्दल बरंच काही बोलता येईल. बोललं जातंही. बासु चॅटर्जी किंवा हृषीकेश मुखर्जी यांच्यासारख्या दिग्दर्शकांच्या एखादी साधी-सुंदर कथा सांगणाऱ्या सिनेमापासून ते गुन्हेगारी जगाचं दाहक चित्रण करणाऱ्या एखाद्या सिनेमापर्यंत, एखाद्या संगीतिकेपासून एखाद्या 'सीरियल किलर'च्या कथेपर्यंत सिनेमाच्या पडद्यावर अनेक इंप्रेशन्स उमटत जातात आणि प्रेक्षकाला उल्हसित, रोमांचित, भयचकित करत राहतात. 

मात्र सिनेमाबाबत आणखी एक गोष्ट आहे. सिनेमा हा एक कलाप्रकार असला तरी 'सिनेमामुळे मुलं बिघडतात' हा एक तक्रारीचा सूर बरेचदा ऐकायला मिळतो. माझ्या लहानपणी, म्हणजे ऐंशी, नव्वदच्या दशकात हा सूर बहुधा जास्त कानावर पडत असे. आज मोबाइल आणि ओटीटीमुळे सिनेमा एका वेगळ्या प्रतलावर पोचला आहे. 'सिनेमा बिघडवतो' हा अंतःस्वर कुठे कुठे जागा असला तरी सिनेमाचा प्रभाव फक्त तरुणांपुरता मर्यादित राहिलेला नाही. सिनेमाचा आस्वाद घेण्यासाठी सगळ्याच पिढ्या पुढे सरसावल्याने तो अंतःस्वर तसा क्षीण झाला आहे. याला सिनेमात झालेला गुणात्मक बदलही कारणीभूत आहेच. नवा सिनेमा अधिक 'खरा', अधिक अस्वस्थ करणारा, अधिक सर्वस्पर्शी आहे. नायक-नायिका-खलनायक हा पारंपरिक साचा मोडून सशक्त, गुंतागुंतीच्या, चौकटीत न बसणाऱ्या व्यक्तिरेखा, त्यांचे परस्परसंबंध आता पडद्यावर येत आहेत. ठरीव रेषेवर चालण्यापेक्षा वेगळीकडे, आडवाटेकडे धाव घेणारी कथासूत्रे सादर होत आहेत. ओटीटीने वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी एक अवकाश खुला केला आहे. तिथली व्यावसायिक वा इतर गणितं जमली नाहीत तर यूट्यूबसारखा पर्याय उपलब्ध आहे. फीचर फिल्म नाही तर वेब सीरिज, छोटे व्हिडिओज, वेगळे दृकश्राव्य प्रयोग करणं शक्य होत आहे.  

दुसऱ्या बाजूला सोशल मीडिया हाताशी असल्याने सिनेमाबद्दल सर्वसामान्य प्रेक्षकांकडून पुष्कळ लिहिलं-बोललं जातंय. त्यातून वादही होतायत! अमुक सिनेमा आवडला/आवडला नाही हा आज मोठ्या, घनघोर फेसबुक चर्चेचा विषय होऊ शकतो. कधीकधी तर कलास्वादाच्या 'अपेक्षांची दोरी' सिनेमा बघणं आणि त्यावर मतप्रदर्शन करणं हे जणू आपलं कर्तव्य आहे इथपर्यंतही खेचली जाताना दिसते. मोजकी माध्यमं असणारा, 'कंटेंट'चं 'राउंड द क्लॉक' वैपुल्य नसणारा काळ आणि आजचा काळ यात एक ठळक फरक आहे. त्यातून माध्यमं आणि अभिव्यक्ती समाजमानसावर किती दूरगामी परिणाम करतात याची साक्ष पटते. 

'अ‍ॅनिमल' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाभोवती जे वादंग निर्माण झालं त्याबद्दल बोलायच्या आधी वरील प्रास्ताविक करणं गरजेचं वाटलं कारण सिनेमा, प्रेक्षक आणि काळ हा 'कॉन्टेक्स्ट' लक्षात घेणं आवश्यक वाटलं. आता 'अ‍ॅनिमल'कडे येऊ. 

चित्रपट : 'स्टोरीटेलिंग' आणि प्रबोधन  

'अ‍ॅनिमल'चा दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा याने दिग्दर्शित केलेला 'अर्जुन रेड्डी' (तेलुगू) आणि त्यानेच दिग्दर्शित केलेला या चित्रपटाचा हिंदी रीमेक 'कबीर सिंग' हे दोन्ही चित्रपट त्यातील नायकाच्या वादग्रस्त चित्रणामुळे गाजले होते. स्त्रीवादी दृष्टीने पाहता तर हे चित्रपट फारच आक्षेपार्ह आहेत. 'अ‍ॅनिमल'बाबत जो आक्षेप घेतला गेला त्यातही सिनेमातील स्त्री पात्रांचं चित्रण आणि नायकाचा त्यांच्याबद्दलचा – कदाचित एकूण स्त्रियांबद्दलचा - दृष्टिकोन यावर आक्षेप घेतला गेला आहे. दुसऱ्या बाजूने पाहता अनेकांना हे चित्रण त्या 'व्यक्तिरेखे'चं चित्रण आहे म्हणून फारसं आक्षेपार्ह वाटलेलं नाही. मला स्वतःला विचार करताना असं जाणवतं की अशा चित्रणाबाबत मला 'बायनरी' (इकडे किंवा तिकडे) भूमिका घेणं अवघड जातं; पण चित्रपटाचा समाजमानसावर परिणाम होतो हे लक्षात घेता 'चित्रपट आस्वादक' आणि 'समाजाचा घटक' यात संतुलन साधत शेवटी ‘समाजाच्या घटका’ला झुकतं माप देणंही गरजेचं वाटतं. 

चित्रपट हे 'कथा सांगण्याचं माध्यम' आहे. ते समाजप्रबोधनाचं माध्यम नाही. त्यातून समाजप्रबोधन होऊ शकतं, ते व्हायला काहीच हरकत नाही; पण चित्रपटावर त्याची सक्ती करणं वाजवी नाही या भूमिकेशी मी सहमत आहे. दुसरं असं की सगळेच चित्रपट समाजप्रबोधन करत नसले तरी सहसा काही संकेत पाळलेच जातात. 'सज्जनांचा विजय आणि दुर्जनांची हार' हे सूत्र चित्रपटांमधून एकेकाळी फार सरधोपटपणे वापरले जाई. खलनायक पूर्ण 'ब्लॅक' तर नायक पूर्ण 'व्हाइट' असे. आज खलप्रवृत्तीचं चित्रण अधिक गुंतागुंतीचं, अधिक 'मानवी' होऊ लागलेलं असलं, माणसात खलप्रवृत्ती तयार होण्याची काही कारणं आहेत हे चित्रित होऊ लागलं असलं तरी 'अंतिम विजय सत्प्रवृत्तीचाच होतो' या गाभ्याला धक्का लागलेला नाही. वास्तववादी, 'डार्क' चित्रपट तयार होत असले तरी चांगुलपणा, न्याय, सहिष्णुता, सकारात्मकता, कुटुंबव्यवस्थेतून आलेली मूल्ये, एकूण नैतिकतेच्या कल्पना यांना उचलूनच धरलं जातं. हे संकेत पाळायचं कारण काय? तर  निर्माता-दिग्दर्शकांना मूलभूत, मूल्यात्मक पायाला धक्का लागता कामा नये ही जाणीव असते. चित्रपट 'डार्क' असला तरी त्याने आशेचे सगळेच किरण विझवता कामा नयेत हा विचार जागा असतो. यात निव्वळ वैचारिकता आहे असंही नाही. प्रेक्षकांना चित्रपट आवडायला हवा या साध्या-सरळ व्यावसायिक दृष्टीमुळेही हे घडतं. चित्रपट पाहून प्रेक्षकांना सकारात्मक वाटावं, भावनिकदृष्ट्या त्यांना उचंबळून यावं, चित्रपटाचे दोन-तीन तास काहीही घडलं तरी शेवट गोड व्हावा या हेतूनेच मुख्य प्रवाहातील बहुतेक चित्रपट तयार होतात. प्रखर वास्तववादी चित्रपटांनी हे संकेत तंतोतंत पाळले नाहीत तरी आधी म्हटल्याप्रमाणे मूलभूत संकेत सर्वस्वी नाकारले जात नाहीत.   

चित्रपटांवर प्रबोधनाची सक्ती नाही हे कदाचित काहींना मान्य होणार नाही. पण सध्या आपण तो मुद्दा बाजूला ठेवू. कारण त्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. सक्ती नाही हे मान्य केलं आणि कबीर सिंग किंवा अ‍ॅनिमलसारख्या चित्रपटांकडे पाहिलं तरी त्यातील काहीच खटकत नाही असं नाही. फक्त मला असं दिसतं की या व्यक्तिरेखा मुळातच सरळसोट नाही आहेत. त्यांचं 'कॅरॅक्टर स्केच' समजून घ्यायला जड जात असल्याने बहुधा आपण त्याला एक लेबल लावतो. हे नायक 'टॉक्सिक' आहेत असं म्हटलं तरी दुसरीकडे त्यांची प्रेयसी/बायकोबाबतची हळवी बाजूही आहे. 'अ‍ॅनिमल'चा नायक आपल्या विवाहित बहिणीला स्वतंत्र विचार करायला प्रोत्साहित करतो. आता याला कुणी लेखक-दिग्दर्शकाची चलाखी म्हणेल; पण एखाद्या कथेच्या चौकटीत त्यातील प्रमुख व्यक्तिरेखांचं वर्तन आपल्याला मूल्यात्मकदृष्ट्या पटण्याजोगं वाटलं नाही तरी व्यक्तिरेखा म्हणून ती असं वर्तन करू शकते हे समजून घ्यायला आपली हरकत नसावी. तिच्या वर्तनात सातत्य आहे की विरोधाभास जाणवतो हा मुद्दा जरूर आहे. पण व्यक्तिरेखा आदर्श असायला हवी असा अट्टाहास धरता येत नाही. इथे आपण काही तुलना करून पाहू.  

'आक्षेपार्ह काय' हा निर्णय आहे, निष्कर्ष नव्हे  

'गॉडफादर' हे चित्रपटाच्या इतिहासातील एक अतिशय गाजलेलं नाव आहे. 'क्लासिक' समजल्या जाणाऱ्या या सिनेमाने किती दिग्दर्शकांना प्रभावित केलं, त्याच्या कथेची किती वेगवेगळी व्हर्जन्स निघाली याची गणतीच नाही. जगभरातल्या समीक्षकांनी, सिनेरसिकांनी हा चित्रपट उचलून धरला आहे. आता गॉडफादर ही वास्तविक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कुटुंबाची कथा आहे. डॉन कॉर्लिऑन आणि त्याचा सर्वात धाकटा मुलगा मायकेल हे दोघे चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत. ज्याला 'रिग्रेसिव्ह' म्हणता येईल असं चित्रण सिनेमात आहे.


'डू यू स्पेंड टाइम विथ युअर फॅमिली? बिकॉज अ मॅन हू डझन्ट स्पेंड टाइम विथ हिज फॅमिली कॅन नेव्हर बी अ रिअल मॅन' असं म्हणणारा डॉन कॉर्लिऑन एका प्रसंगात 'विमेन अँड चिल्ड्रेन कॅन अफोर्ड टू बी केअरलेस, बट नॉट मेन' असंही म्हणतो. मायकेल आणि त्याची बायको वेगळे राहू लागल्यानंतर मायकेल मुलांना स्वतःकडे ठेवतो. आईपासून वेगळं करतो. एका प्रसंगात तो तिच्यावर हातही टाकतो. असं असूनही गॉडफादर हा एक श्रेष्ठ सिनेमा समजला जातो. 
मार्टिन स्कॉर्सीससारख्या दिग्दर्शकाचे काही चित्रपटही पुरुषकेंद्री आणि 'पुरुषी' वर्तनाला 'अनअपॉलॉजेटिकली' चितारणारे आहेत असं दिसतं. अर्थात यापैकी कुठल्याच चित्रपटात लैंगिक दुर्वर्तनाचं/गुन्हेगारीचं समर्थन केलेलं नाही. त्याअर्थी त्यातील पुरुष हे 'गुड मेन' आहेत. (आपल्याकडे 'प्यार का पंचनामा' या पुरुषकेंद्री सिनेमातही सुरुवातीलाच एका छोट्या सीनमध्ये चित्रपटाचे नायक अशा वर्तनाच्या विरुद्ध आहेत असं सूचित केलं आहे). हिंदी सिनेमाचा विचार केला तर नायकाने नायिकेचं प्रेम मिळवण्यासाठी तिच्या मागे लागण्यापासून इतर अनेक प्रकारातून रिग्रेसिव्ह वर्तनाचं चित्रण केलेलं दिसतं. 'बाजीगर'मध्ये शाहरुख खानने अँटी हीरो साकारला आहे. त्यात तो जेव्हा आपला 'सूडाचा प्लॅन' साध्य करण्यासाठी शिल्पा शेट्टीबरोबर प्रेमाचं नाटक करून तिचा खून करतो तेव्हा त्याला रिग्रेसिव्ह म्हणायचं की अँटी हिरोइक यावर चर्चा होऊ शकते. डर, अंजाम या चित्रपटांमधून त्याने 'ऑब्सेसिव्ह लव्हर'च्या ज्या भूमिका केल्या त्याही गाजल्या आहेत. एआयबी या इंटरनेट मीडिया कंपनीने मागे रिचा चड्ढा या अभिनेत्रीला घेऊन 'हरॅसमेंट थ्रू द एजेस' या शीर्षकाचा एक व्हिडीओ केला होता. तो इंटरनेटवर उपलब्ध आहे. नायकाने नायिकेच्या 'मागे’ लागण्याचं हिंदी सिनेमाने किती ग्लोरिफिकेशन केलं यावर हा व्हिडीओ आहे.  

थोडक्यात सांगायचं तर अशा प्रकारचं, आक्षेपार्ह वाटेल असं चित्रण सिनेमातून होत असतं. आता होतं असं की ते चित्रण आपल्याला आक्षेपार्ह वाटतंय की 'जस्टिफायेबल' वाटतंय याचा निर्णय आपण आपले ठोकताळे लावून करत असतो. त्यासाठी कुठलंही 'रुल बुक' नाही. (अर्थात छापील पुस्तक नसलं तरी मूल्यात्मक निर्णय देऊ शकणारं एक पुस्तक आपल्या डोक्यात असावं अशी आशा करायला हरकत नाही). आणखी एक मुद्दाही जाणवतो. 'नावडतीचं मीठ अळणी' या छोट्याशा म्हणीतून स्पष्ट केलेला तो एक मोठा मानसशास्त्रीय मुद्दा आहे. शाहरूख खान, अल पॅसिनो हे अभिनेते आपल्याला आवडतात. त्यामुळे त्यांच्याकडून स्क्रीनवर काही वावगं झालं तर आपण त्यांना माफ करू शकतो. किंवा ते अपवादात्मक आहे असं म्हणू शकतो. इथून पुढे जात आपण तर्कसंगती लावूनही काही निर्णय देतो. उदा. 'गॉडफादर'सारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कुटुंबातील पुरूषांचं चित्रण बघताना आपण ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत असं म्हणून त्या चित्रणाला काहीशी सूट देतो. अमुक पात्राचं वर्तन त्या विशिष्ट कथेच्या चौकटीत बघताना ते 'लार्जर आयडियॉलॉजिकल सेन्स'ने पाहता चुकीचं असलं तरी त्या पात्राच्या व्यक्तिमत्वाच्या कक्षेत, त्या कथेच्या कक्षेत ते ठीक आहे, पटण्यासारखं आहे असं आपण म्हणतो. (आता इथे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचं चित्रण करावं का, त्यातून त्यांचं ग्लोरिफिकेशन केलं जातं ते योग्य नाही असेही मुद्दे निघतील. सध्या ते नोंदवून पुढे जाऊ). थोडक्यात आपण स्क्रीनवर जे पाहतो आहोत ते आपल्याला 'कन्व्हिन्सिंग' वाटतंय की नाही असा निकष आपण लावतो आणि तो योग्य आहे असं मला वाटतं. (एकाला जे कन्व्हिन्सिंग वाटेल ते दुसऱ्याला नाही हे पुन्हा आहेच. पण ते असो.)

कबीर सिंगअ‍ॅनिमल यासारख्या चित्रपटांबाबत मला असं दिसतं की 'लार्जर आयडियॉलॉजिकल सेन्स'ने पाहता ते चित्रण आक्षेपार्ह असलं तरी आपल्याला ज्याचे मार्ग आवडत नाहीत असं एखादं पात्र निर्माण होऊ शकतं आणि जोवर त्या आक्षेपार्ह वर्तनाला शब्दांमधून जस्टिफाय करण्याचा प्रयत्न होत नाहीये तोवर ठीक आहे. कारण 'आयडियॉलॉजिकल करेक्टनेस' हा एक आदर्श आहे आणि चित्रपटांमधून निर्माण होणारी पात्रं कायम तो बाळगूनच वागतील अशी अपेक्षा करणं योग्य होणार नाही. चित्रपट ही कथा आहे आणि कथेमध्ये गुंतागुंतीची, रिग्रेसिव्ह-प्रोग्रेसिव्ह सगळ्याच प्रकारच्या वृत्तीची पात्र असू शकतात. मुख्य पात्राने पुरोगामित्वाच्या सर्व निकषांवर टिकमार्क करत जात 'संपूर्ण पुरोगामी' असावं असाही आग्रह धरू नये. कारण ती एक कथा आहे. कथा पुरोगामी किंवा प्रतिगामी नसेलच असं नाही; पण तिचं प्रथम ‘कथा असण्याचं’ स्वतंत्र्य आपण मान्य करायला हवं आणि तिचं मूल्यमापन कथेच्या निकषांवर करायला हवं.  

'अ‍ॅनिमल'ची अडचण 

चित्रपटाचा विचार कथा म्हणून केला तरी त्यातून प्रतीत होणारा विचार जर प्रतिगामी आणि म्हणून आक्षेपार्ह वाटला, त्यात ‘प्रोपगंडा’ जाणवला तर ती मात्र गंभीर गोष्ट आहे. 'अ‍ॅनिमल' च्या बाबतीत संदीप रेड्डी वंगाने हा घोळ नक्कीच घातला आहे. 'कबीर सिंग'लाही कदाचित पूर्ण सूट देता येणार नाही; पण 'अ‍ॅनिमल' त्याच्या बराच पुढे जातो. व्यक्तिशः मला संदीप रेड्डी वंगा हा दिग्दर्शक 'स्टोरीटेलर' म्हणून प्रभावी वाटतो. तो आणखी काही इंटरेस्टिंग करू शकेलही; पण आत्ता तरी तो 'पारंपरिक पुरूषत्वा'च्या प्रेमात पडून त्याचं उदात्तीकरण करत चालला आहे असं दिसतं. चित्रपट समीक्षक भारद्वाज रंगनने अ‍ॅनिमलची समीक्षा करताना 'एक्झिलरेटिंग रॉनेस' (रोमांचित करणारा ओबडधोबडपणा) असा शब्द वापरला आहे. (हिंदी सिनेमाबाबत बोलायचं झालं तर रामगोपाल वर्माचे सुरुवातीचे चित्रपट, अनुराग कश्यपचे चित्रपट यांनी जो 'एक्झिलरेटिंग रॉनेस' दिला तो नक्कीच जास्त खोल आणि 'लार्जर आयडियॉलॉजिकल सेन्स'ला फार धक्का न लावता दिला आहे). 

'अ‍ॅनिमल' च्या कथेबाबत, सादरीकरणाबाबत मला काही गोष्टी पटल्या नाहीत. पण आपली चर्चा मूल्यात्मक अंगाने सुरु असल्याने त्या सध्या बाजूला ठेवू. एक मुख्य मुद्दा असा की चित्रपट पाहताना तुम्हाला जर 'पुरूषांची लढाई'च दाखवायची आहे तर मग तीच फक्त नीट का नाही दाखवत असा प्रश्न पडला. त्याच्या जोडीला स्त्री-पुरुष संबंधावरचं भाष्य आणत आपल्या भूमिकेचं समर्थन करण्याची कसरत कशासाठी? कबीर सिंगवरील टीकेमुळे ही अतिरिक्त काळजी घेतली की काय असं वाटायला पुष्कळ वाव आहे. स्त्री-पुरुष नातं 'इंटेन्स', पण पुरुषाच्या बाजूने झुकलेलं, पुरूषाच्या 'व्ह्यू पॉइंट'ने दाखवलेलं असल्याने होतं असं की या नात्याला दोन बाजू आहेत, 'ड्युएल इम्पॉर्टन्स' आहे हे विसरलं जातं. नाही म्हणायला चित्रपटात नायिकेला (रश्मिका मंदाना) एक भला मोठा संवाद दिला आहे; पण हे फक्त बोलण्यापुरतं असणार आहे, एकदा यांचं हे बोलणं झालं की नंतर तो हातात बंदूक घेऊन बाहेर पडणारच आहे तर थेट तिथेच का नाही जात असं काहीतरी वाटत राहतं!

ही 'जस्टिफिकेशन'ची, दोन डगरींवर पाय ठेवण्याची कसरत सिनेमाला मारक ठरली आहे. तुम्हांला जर एक हिंसक सूडपट करायचा आहे तर तो करा. त्यात 'आयडियॉलॉजिकल डिबेट' आणण्याचं काय कारण? (सहसा अशा हिंसक सिनेमांमध्ये स्त्री पात्रं नावापुरतीच असतात; कारण त्या सिनेमाची जातकुळीच तशी असते. पण मग ते परडवलं असं म्हणावं लागेल. निदान तिथे अती बोलून घोळ तरी घालत नाहीत! आता अशा सिनेमांबद्दल एकूण काय बोलावं हा आणखी वेगळा मुद्दा). 'अ‍ॅनिमल'च्या नायकाने काही गोष्टींना तात्त्विक मुलामा देणं ही एक गंभीर गोष्ट आहे. तो जेव्हा आदिम काळातील स्त्री-पुरुष संबंधांबद्दल बोलतो आणि 'अल्फा मेल'चा उल्लेख करतो तेव्हा आज आपण तिथून किती पुढे आलो आहोत हे त्याच्या गावी नसतं. अटळ जीवशास्त्रीय संदर्भात काही गोष्टी बदलत नाहीत हे खरं आहे, 'बायॉलॉजी'ला हात घातल्याशिवाय 'आयडियॉलॉजी' जिंकणार नाही हे माझंही मत आहे. पण म्हणून 'बायॉलॉजी इज द अल्टिमेट एक्स्प्लनेशन' असं जर कुणी म्हणालं तर ती मोठीच अडचण आहे! 'पुरूषा'ला 'प्रेझेंट' करणं ही एक गोष्ट झाली - जी वर उल्लेख केलेल्या इतर दिग्दर्शकांनीही केली आहे - पण 'पुरूषा'ला सतत बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करणं ही वेगळी गोष्ट आहे. असं सातत्याने करत राहिलं तर ते आर्टिस्टिक न राहता पॉलिटिकल होतं आहे असं वाटतं. मला वाटतं याबाबत संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शक म्हणून 'डेंजर झोन'मध्ये आहे. आता इथून तरी त्याने परत फिरावं! 'सॅडली, इट्स अ मॅन्स वर्ल्ड' असं वाक्य 'अ‍ॅनिमल'च्या नायकाच्या तोंडी आहे. दिग्दर्शकाने या 'सॅडली'चा धांडोळा आपल्या पुढच्या सिनेमात घ्यायला हरकत नाही! 

संदर्भ : भारतीय प्रेक्षक

सामाजिक संदर्भ, सामाजिक महत्त्व असणाऱ्या एखाद्या विषयावर जगात सर्वत्र एकाच पद्धतीने विचार करता येत नाही. विविध समाजांची घडण, त्यांची समज, साधारण स्वभाव यानुसार विचार बदलावा लागतो. सिनेमा हा कलाप्रकार पाश्चात्त्य जगतात जन्माला आला, रुजला आणि वाढला. तिथे तो अधिक प्रगल्भ अवस्थेत आहे. तिथल्या समाजात आणि आशियाई, विशेषतः भारतीय समाजात सिनेमाबाबत समजुतीचे जे फरक आहेत त्याच्या मुळाशी हा एक मुख्य फरक आहे. सरासरी पाश्चात्त्य प्रेक्षक हा थोडा अधिक प्रगल्भ प्रेक्षक आहे. तो वेगवेगळे चित्रपट हाताळू शकतो आणि चित्रपटांना थिएटरमध्ये ठेवून घरी येऊ शकतो. आणि जर सिनेमाच्या प्रभावाखाली त्याच्याकडून काही आगळीक घडलीच तर तिथली कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा ते हाताळायला सक्षम आहे. भारतासारख्या देशातला सरासरी प्रेक्षक हा असा प्रगल्भ प्रेक्षक नाही. पाश्चात्त्य सिनेमातून किती वैविध्यपूर्ण विषय किती प्रगल्भतेने हाताळले गेले आहेत ते पाहता इथल्या प्रेक्षकाला अचंबा वाटेल, कदाचित घेरी येईल, हे मी माझ्या पाश्चात्त्य सिनेमाच्या अनुभवावरून सांगू शकतो. आपलं मानस अद्याप अशा 'मॅच्युअर थीम्स'साठी तयार नाही. सिनेमाबाबत आपण अजूनही 'व्हल्नरेबल' आहोत. वर उल्लेख केलेल्या मार्टिन स्कॉर्सीस या नामांकित दिग्दर्शकाचा 'द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' नावाचा एक चित्रपट आहे. हा चित्रपट पाहिला तर आपल्या प्रेक्षकांना वर म्हटलं तसं घेरी येऊ शकेल. शेअर बाजारात झपाट्याने वर चढलेल्या आणि घोटाळे केल्यामुळे उतरणीला लागलेल्या जॉर्डन बेलफोर्ट या न्यू यॉर्कमधील एका स्टॉक ब्रोकरच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा आहे. संपूर्ण चित्रपटात पैसा, लैंगिक व्यवहार, ड्रग्ज यांचं मुक्त चित्रण आहे. या चित्रपटाला पाच ऑस्कर नामांकनं होती.  

 ऑस्कर मिळालं नाही; पण चित्रपटाला ऑस्कर नामांकनं मिळाली हे पुरेसं बोलकं आहे. आपल्याला असं दिसेल की एक अगदी वेगळं, आपल्या प्रस्थापित नैतिक कल्पनांना धक्का देईल असं जग सिनेमातून निर्माण करण्याची सृजनशक्ती हॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्यांकडे आहे आणि त्या जगाकडे सिनेमा म्हणून पाहण्याची समज तिथल्या प्रेक्षकांकडे आहे. सिनेमा पाहताना त्यांचा निकष 'सांगितली जाणारी कथा सिनेमा म्हणून माझ्यातल्या सुजाण प्रेक्षकाला बांधून ठेवते आहे का?' हा असतो. कथेमध्ये येणारे लैंगिक वा इतर संदर्भ पूरक असतात. ते ‘निकष’ नसतात. दुसरं म्हणजे मार्टिन स्कॉर्सीससारखे दिग्दर्शक जेव्हा पुरुषकेंद्री चित्रपट तयार करतात तेव्हा त्यांची पात्रं आपलं 'कॅरॅक्टर' सोडून आयडियॉलॉजिकल चर्चेच्या फंदात पडत नाहीत. कारण त्या चर्चेची ती जागाच नाही. त्या संदर्भात वेगळे चित्रपट तयार होऊ शकतात आणि होतातही. 'अ‍ॅनिमल'सारख्या चित्रपटातून घातले जाणारे घोळ तिथे घातले जात नाहीत.   


'पेज थ्री'चं प्रस्थ जेव्हा वाढत चाललं होतं त्यावेळी बोलताना माझी एक मैत्रीण म्हणाली होती की पेज थ्री ही जागा पार्ट्या, सेलिब्रिटी गॉसिप इ. गोष्टींकरताच राखीव आहे. त्यामुळे त्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही. वृत्तपत्राच्या संपादकीय पानावरील मजकूर कसा आहे, बातम्या कशा दिल्या जातात यावरून त्या वृत्तपत्राचा दर्जा जोखावा लागतो. त्यामुळे वृत्तपत्राची समीक्षा संपादकीय आणि बातम्यांवरून व्हावी. पेज थ्री वरून नव्हे. तिच्या म्हणण्यात मला तथ्य वाटलं होतं. पण परत मुद्दा असा आहे की पेज थ्री असल्याने लोक त्या पानावर जास्त प्रमाणात जात असतील आणि संपादकीय पानाकडे दुर्लक्ष करत असतील तर काय करायचं? त्यामुळे मला वाटतं 'अ‍ॅनिमल'सारखे चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या संदर्भात धोकादायक ठरू शकतात. चित्रपटाचं नावच 'अ‍ॅनिमल' आहे. त्यातून चित्रपटाचा सूर काय असेल, कथानायक कसा असेल हे ध्वनित होतं. हा चित्रपट ‘चांगले संस्कार’ करण्यासाठी काढलेला नाही हे स्पष्ट होतं. चित्रपट पाहताना ही 'अ‍ॅनिमल चौकट’ लक्षात घेऊन पाहणं अपेक्षित आहे. अडचण अशी आहे की इथला प्रेक्षक चौकटीच्या आत घुसून स्वतःच 'अ‍ॅनिमल' होऊ पाहील अशी भीती वाटते. त्यामुळे 'अ‍ॅनिमल' हा 'सिनेमॅटिक प्रश्न म्हणून फार मोठा नाही; पण समाजशास्त्रीय प्रश्न म्हणून मोठा आहे!

- मिळून साऱ्याजणी, फेब्रुवारी २०२४ 

 

Tuesday, March 24, 2020

बागी का धरम का होत है?

चित्रपट सुरू होतो. संपूर्ण काळा स्क्रीन. 'बेवकूफ और चूतिये में धागेभर का फरक होता है गा भैय्या' हे सैफ अली खानच्या आवाजातलं वाक्य ऐकू येतं. मग सीन सुरू. डोंगरांच्या विस्तीर्ण पार्श्वभूमीवर, एका कड्यावर दोघेजण प्रेक्षकांकडे पाठ करून बसलेले आहेत. पुढचं वाक्य - 'धागे के इंगे बेवकूफ और उंगे चूतिया...और जो धागा हैंच लो तो कौण है बेवकूफ और कौण है चूतिया - करोड रूपये का प्रसन है भैया...'

सिटी प्राइड मल्टिप्लेक्समध्ये रात्री मित्रांबरोबर 'ओंकारा' पाहायला आलेलो असताना स्क्रीनवर हे इथवरचं मी उभ्यानेच पाहिलं. कारण कायतरी गडबड झाली होती आणि आमच्या जागा सापडत नव्हत्या. मग थोड्या वेळाने असा साक्षात्कार झाला की तिकिटं काढायला चुकली आहेत. नक्की काय झालं होतं आठवत नाही. पण स्क्रीनमधून बाहेर यावं लागलं. 'आता काय करायचं?' वगैरे चर्चा सुरू झाली. मित्रांची लग्न झालेली असल्याने ते बहुधा मोक्षापर्यंत पोचले होते. त्यामुळे पहिल्या सीनच्या दर्शनाने आणि पहिला डायलॉग ऐकल्यानंतर माझ्या मनात जी खळबळ उडवली ती त्यांच्या मनात बहुधा उडाली नव्हती. निर्विकारपणे कॉफी प्यायला जायचं ठरलं. म्हणून मग कॉफी प्यायला गेलो. घरी आलो. सकाळी उठल्यावर मी पहिल्यांदा सिटी प्राइड गाठलं. 'ओंकारा' पाहिला. त्यानंतर जीव शांत झाल्याचं लक्षात आलं.

हे २००६ साल होतं. (२००७ साली माझंही लग्न झालं तरी अजून मोक्ष मिळालेला नाही, मिळायला नकोही आहे!) 'ओंकारा'मुळे अभिषेक चौबे हे नाव माहीत झालं. विशाल भारद्वाजबरोबर त्याने 'ओंकारा' लिहिला होता. पुढे विशाल भारद्वाज आणि इतरांबरोबर 'कमीने' लिहिला. 'इश्किया', 'डेढ इश्किया' आणि 'उडता पंजाब' इतरांबरोबर लिहिले. हे तीन त्यानेच दिग्दर्शित केले होते. 'डार्क, पण तरी सिल्व्हर लायनिंग आहे' अशा प्रकारचे हे चित्रपट आवडलेच आणि अभिषेक चौबेची ही स्टाइल आहे (विशाल भारद्वाजच्या जवळ जाणारी) हे लक्षात येऊ लागलं.

मग 'सोनचिडिया' पाहिला आणि मी अभिषेक चौबेचा जवळजवळ जयजयकार केला! 'कॅरॅक्टर बिल्डिंग' म्हणून काहीएक गोष्ट असते. 'कास्टिंग' म्हणून काहीएक गोष्ट असते. 'अभिनय' म्हणून काही एक गोष्ट असते. 'भाषा' म्हणून काहीएक गोष्ट असते. सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे 'चित्रपट करतानाचं गांभीर्य' म्हणून काहीएक गोष्ट असते. 'चित्रपट' ही एक 'समग्र कला' आहे हा अनुभव देणारे जे उत्तम चित्रपट असतात त्यातला एक म्हणजे 'सोनचिडिया'. कुठलीही चांगली कलाकृती हा 'अनुभव' असावा लागतो. आपण 'तिथे गेलो आहोत' 'आपल्यासमोर हे सगळं चाललंय' असा अनुभव. 'सोनचिडिया' तुम्हांला चंबळचं खोरं दाखवतोच, डकैत दाखवतोच, पण तो त्यांची जी कथा सांगतो ती तुम्हांला हलवून सोडते.

चित्रपट एकाच वेळी संथ आणि वेगवान आहे. पण कमाल एंगेजिंग आहे. घटनाक्रमातून हळूहळू गोष्टी उलगडत जातात आणि तुम्ही चित्रपटात 'जाऊन बसता'. हा नुसता 'क्राइम ड्रामा' नाही. हा एक 'प्रोफाउंड ड्रामा ऑफ लाइफ' आहे. 'बागी' झालेले जीव आपली मुक्ती चंबळच्या दऱ्याखोऱ्यात शोधतायत. त्यांनी हातात घेतलेल्या बंदुकांचा ट्रिगर ओढणारे हात फक्त डाकूंचे नाहीत. ते केविलवाण्या माणसांचेही आहेत. 'बागी का धरम का होत है?' 'ये तो बदला हुआ, न्याय कैसे हुआ?' हे प्रश्न इथे एक बागी डाकूच विचारतोय. इथली हिंसा ही हा मूळ ध्वनी नाही, प्रतिध्वनी आहे. आणि म्हणूनच 'सोनचिडिया' हा चित्रपट एक अव्वल आधिभौतिक अनुभव ठरतो. 

पात्रनिवड, अभिनय, कॅमेरा आणि कडक बुंदेली भाषा ही चित्रपटाची काही उल्लेखनीय बलस्थानं आहेत. मनोज वाजपेयीची भूमिका छोटी असली तरी ऑस्करच्या तोडीची आहे. काय अभिनेता आहे हा! 'सहृदय डकैत' मानसिंगची भूमिका त्याने अफाट ताकदीने केलीय. रणवीर शौरीला पाहताना त्याच्या 'तितली'मधल्या भूमिकेची आठवण होते. अत्यंत आक्रमक आणि अत्यंत भावनाशील! रणवीर शौरी भूमिकेला पुरून उरतो. सुशांत सिंग राजपूतने त्याच्या शहरी बाजाला पूर्ण छेद त्याची भूमिका प्रभावीपणे केली आहे. भूमी पेडणेकरला बघताना मला 'उडता पंजाब'मधली आलिया भट आठवत राहिली. पितृसत्ताक पद्धतीने पूर्णपणे कब्जात घेतलेल्या व्यवस्थेत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची भयकारी धडपड करणारी स्त्री. भूमी पेडणेकर आणि तिच्याबरोबरची मुलगी यांच्याभोवतीच खरं तर चित्रपटाचा उत्तरार्ध फिरत राहतो. या दोघी चित्रपटाच्या 'स्पिरिच्युअल क्वेस्ट'चा प्रमुख भाग आहेत. मात्र विशाल भारद्वाज आणि अभिषेक चौबेच्या इतर चित्रपटांप्रमाणेच 'सोनचिडिया'चे हीरोज दुय्यम पात्रंही आहेत. मानसिंगच्या गॅंगमधले बागी असोत, निव्वळ डोळ्यांनीच समोरच्याला खाऊन टाकणाऱ्या आशुतोष राणाच्या टीममधले लोक असोत, गावातली इतर पात्रं असोत - 'सोनचिडिया' बिलॉन्ग्ज टू ऑल ऑफ देम! यातल्या फूलन देवीला (चित्रपटात ती 'फुलिया' या तिच्यावर बेतलेल्या पात्राच्या रूपात दिसते) बघून तर मी हात उंचावून टाळ्या वाजवायच्या घाईला आलो होतो! कमाल, कमाल! तिच्या अजिबात ड्रॅमॅटिक नसलेल्या एंट्रीलाही शिट्टीचा मोह होतो!

अनुराग कश्यपचा डार्कनेस हा कंप्लीट डार्कनेस आहे. तो रूथलेस होऊन काही गोष्टी दाखवतो. विशाल भारद्वाजचा डार्कनेस मला मिश्र स्वरूपाचा वाटतो. पण त्यातही असं लक्षात येईल की त्याने शेक्सपियरची जी रूपांतरे केली आहेत त्यात मूळ कथा डार्क असल्याने रूपांतरेही तशी आहेत. पण त्याची मूळ प्रकृती वर लिहिल्याप्रमाणे डार्कनेसला सिल्व्हर लायनिंग देण्याची आहे असं वाटत राहतं. अभिषेक चौबे आणि विशाल भारद्वाज यांच्यात याबाबतीत एक साम्य आहे असं जाणवतं. 'उडता पंजाब'मध्ये जे अनुभवायला मिळतं (कठोर वास्तव आणि तरी दिलासा देणारा शेवट) तेच 'सोनचिडिया'बाबतही होतं.

चित्रपट जरूर पहा. संवाद जरा कान देऊन नीट ऐकायला लागतील, पण ऐका. विशाल भारद्वाजचं संगीत हा एक स्वतंत्र विषयच आहे. 'ओंकारा'मधल्या श्रेया घोषालने गायलेल्या 'ओ साथी रे' सारखंच रेखा भारद्वाजने गायलेलं 'सोनचिडिया' आतमध्ये रेंगाळत राहतं. शूटआउटचे सीन्स, चंबळमधले कोरडेठक्क, रखरखीत, एकाकी पडलेल्या  योग्यासारखे डोंगर, जातिसंस्थेचा विजयी वावर, स्त्रीदास्याची दाहकता, धर्म-बिरादरी-ईश्वर यांची पोलादी पकड - हे सगळंच आतमध्ये रेंगाळत राहतं.

लहानपणी वाचलेल्या गोष्टींमध्ये राजाचा प्राण पोपटात वगैरे असण्याची गोष्ट असायची. 'सोनचिडिया' म्हणजे ज्यात आपला जीव आहे अशी चिमणी आहे आणि जो तो आपापली चिमणी पकडायला धावतोय ही भावना चित्रपट व्यापून उरते. आपल्या प्रत्येकाच्या जगण्याच्या कथेत 'अंतर्द्वंद्व' आणि 'बाह्यद्वंद्व' या दोन गोष्टी असतात. नीट पाहिलं तर यातलं 'बाह्यद्वंद्व' वेगळं असं काही आहे का असा प्रश्न पडतो. पहिलंच सगळं काही आहे असं वाटू लागतं. 'सोनचिडिया' ही या अंतर्द्वंद्वाची कथा आहे. यात बंदुका आहेत. आपल्या बंदुका वेगळ्या आहेत इतकंच.                               
#Sonchidiya
#Zee5

(फेसबुक पोस्ट)

Wednesday, March 18, 2020

'फ्लीबॅग' पाहिल्यावर... 

'कोसला वाचल्यावर' या शीर्षकाचा पु. ल. देशपांडेंचा एक लेख आहे. 'कोसला'मुळे भारून जाऊन त्यांनी तो लिहिला आहे हे वेगळं सांगायला नकोच. (कोसला १९६३ साली प्रकाशित झाली. हा लेख १९९६ सालच्या मौज दिवाळी अंकात आला होता. हे ३३ वर्षांच्या गॅपचं गणित मात्र मला कळलेलं नाही.) कोसला वाचायला सुरूवात केली आणि पांडुरंग सांगवीकर एकदम  दोस्तीत येऊन बोलायला लागला; आम्ही दोघे आरामात पाय पसरून गप्पा मारायला लागलो अशा आशयाचं पुलं लिहितात. 'फ्लीबॅग' आणि 'कोसला' हे कनेक्शन तसं विचित्र वाटेल, पण फ्लीबॅग पाहिल्यापासून 'फ्लीबॅग पाहिल्यावर' अशाच शीर्षकाने काही लिहावंसं वाटू लागलं. कारण फ्लीबॅगसुद्धा पहिल्या एपिसोडच्या पहिल्या फ्रेमपासून सांगवीकरसारखीच दिल खोलके बोलत होती. एकूण २ सीझन्स, १२ एपिसोड्स भडाभडा बोलली आणि मग गप्प झाली. आणि जे बोलली ते उदाहरणार्थ फारच थोर होतं.

फोर्थ वॉल - प्रेक्षक आणि अभिनेत्याच्या दरम्यानची अदृश्य भिंत - ब्रेक करत पात्राने बोलण्याचा माझा पहिला अनुभव 'हाऊस ऑफ कार्ड्स'चा होता. फ्लीबॅग फोर्थ वॉल अधूनमधून ब्रेक करत नाही, तर जवळजवळ तोडूनच टाकते. म्हणजे तुम्ही जवळजवळ तिच्यासमोर टेबलावर बसून तिची वटवट मनोभावे ऐकता. फ्लीबॅग लिहिणारी आणि साकारणारी फीबी वॉलर-ब्रिज आधी एक एकपात्री प्रयोग सादर करायची त्यावर आधारलेली ही मालिका आहे. 'फ्लीबॅग' या विचित्र नावाची ही ब्रिटिश मुलगी आहे. लंडनमध्ये राहते. स्वतःचा कॅफे चालवते. एका घटनेमुळे अपराधभावाने ग्रासलेली आहे. इमोशनली ब्रोकन आहे. सेक्शुअली चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. गोंधळलेली आहे. काही बाबतीत भलतीच क्लिअरही आहे. तिच्या मोठ्या बहिणीशी तिचं विशेष नातं आहे. वडिलांशी नातं आहे - ते अधेमधेच विशेष होताना दिसतं. तिच्या आयुष्यातले पुरूष लोकोत्तर आहेत. तिचं आणि त्यांच्यातलं डायनॅमिक्स अलौकिक आहे. ती या सगळ्याचबद्दल तुमच्याशी काहीही हातचं राखून न ठेवता बोलते. फ्लीबॅगचं एक वैशिष्ट्य असं की 'ही जरा अंगावर येतेय' असं वाटण्याची क्षमता असणारी ही व्यक्तिरेखा अजिबात अंगावर येत नाही. यू फील ओन्ली लव्ह फॉर हर...ऑल्वेज! तिच्याबद्दल, तिच्या सगळ्या उपद्व्यापांबद्दल, तिच्या भरकटलेपणाबद्दलदेखील तुम्हांला फक्त प्रेमच वाटतं. यात फीबी वॉलर-ब्रिजच्या कमाल अभिनयाचा, स्पाँटेनिटीचा फार मोठा वाटा आहे. फ्लीबॅगसाठी तिला लेखनाबरोबरच अभिनयाचीही अनेक अवॉर्ड्स मिळाली यात नवल नाही. तिच्या बरोबरीने तिची मोठी बहीण क्लेअर (सियान क्लिफर्ड), तिचा नवरा मार्टिन (ब्रेट गेलमन), वडील (बिल पॅटरसन), सावत्र आई (ऑलिव्हिया कोलमन - टेरिफिक!) आणि लास्ट बट नॉट द लीस्ट - फ्लीबॅग अंतिमतः ज्याच्यापाशी स्थिरावते तो प्रीस्ट (अँड्र्यू स्कॉट) यांची कामं उत्तम झालेली असली तरी फीबी ओन्स द शो! मुळात एक असं आहे की फ्लीबॅगसारख्या उत्तम निर्मितीविषयी 'चांगला अभिनय' ही वेगळेपणाने सांगायची गोष्ट राहतच नाही. तीन मिनिटांची भूमिका करणारा अभिनेतादेखील कायम लक्षात राहील असा अभिनय करून जातो. प्रत्येक पात्र काही ना काही वैशिष्ट्ये घेऊन, अत्यंत धारदार लेखणीतून उभं राहिलेलं असल्याने त्या कलाकृतीच्या एकूण 'प्रोजेक्ट'मध्ये आपली जागा उजळून काढतं.

फ्लीबॅग 'बॅड फेमिनिस्ट' आहे हे एक मला जामच आवडलं. ती अजिबात पॉलिटिकली करेक्ट राहायचा प्रयत्न करत नाही. त्या अर्थी ती स्त्रीवादाला न घाबरणारी स्त्री आहे. एका प्रसंगात I sometimes worry that I wouldn't be such a feminist if I had bigger tits हे तिचं म्हणणं मला तरी प्रामाणिकपणे आल्याचं जाणवलं. याचं एक कारण म्हणजे शारीरिक ठेवणीविषयी, शरीरधर्माविषयी आणि अवयवांविषयी या मालिकेत आयडियॉलॉजिकल डीबेटच्या पलीकडे जाऊन बोललं गेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूने फ्लीबॅगचा एकूण अप्रोच, तिचं मुक्त असणं, गोंधळलेलं असणं, हर्ट झालेलं असणं, झगडत राहणं, नात्यांबाबत प्रयोग करत राहणं यातून ती स्त्रीवादाचा औपचारिक-अनौपचारिक स्वीकार न करताही एक ऑर्गेनिकली ग्रोन आणि तरी लिबरेटेड वुमन म्हणून समोर येते. ती सतत गोष्टी एक्सप्लोअर करते आहे - तिच्या इंपल्सनुसार, बुद्धीनुसार, भावनिक आवेगानुसारही. त्यामुळे ती खरी वाटते आणि तेवढीच पुरेशी वाटते.

भावनिक पातळीवर अस्थिर असलेल्या फ्लीबॅगसाठी सेक्स हा एक अनुभवण्याचा आणि चिंतनाचाही विषय आहे. I'm not obsessed with sex, I just can't stop thinking about it. The performance of it. The awkwardness of it. The drama of it. The moment you realise someone wants your body. Not so much the feeling of it - असं ती म्हणते. मला असं दिसतं की इमोशनली ब्रोकन किंवा एकूण जगण्याबद्दल सिनिकल झालेली किंवा कशातच अर्थ न गवसणारी माणसं सेक्सचा आधार घेत असावीत. It might be working for them because that's the only pleasure/experience that does not pose any further questions. The whole thing is wrapped in the shades of excitement. It is the 'rawness' that works I guess. With the thought of sex and with the act of it, you kind of travel beyond the virtuous debates. इमोशनली ब्रोकन असलेल्या फ्लीबॅगबाबत हे लागू पडेल असं वाटतंही आणि नाहीही. ती सेक्सकडे तिच्या भावनिक दुखावलेपणाला बाजूला ठेवून बघते आहे असं समोर तरी येतं. Moreover, for her, sex doesn't just remain an act of pleasure, it's more of a conversation for her. तिचे जे सेक्शुअल एन्काउंटर्स आहेत त्यामध्ये 'चांगल्या प्रतीच्या सेक्ससाठी उत्सुक असणारी स्त्री' हे ठसठशीतपणे दिसतंच. सेक्शुअल ग्रॅटिफिकेशनच्या चाहुलीने निर्माण झालेली तिची अधीरता ती अजिबात लपवत नाही. आणि दुसऱ्या बाजूने तिची काही पुरूषांची निवड विचित्रही वाटते. All in all, sex purely for the sex's sake अपेक्षिणारी ती स्त्री आहे आणि ते मला अतिशय स्वागतार्ह वाटलं. Sexual promiscuity has been at the receiving end of moral indignation, but I think it certainly doesn't form the basis for moral judgement. Simply because sexual promiscuity does not demean any of the human values.       

भरकटलेलं आयुष्य जगणारी, त्यासाठी स्वतःवर अधेमधे उखडणारी, जगावर उखडूनच असलेली, बहिणीवर माया असणारी आणि मुख्य म्हणजे मनात एक 'दंगल' घेऊन वावरणारी फ्लीबॅग मालिका संपताना प्रेमाचा रस्ता चोखाळते हे पाहून तुम्हांलाच शांत शांत वाटतं. आणि ही मुलगी आता पुढे काय करणार ही शंकाही मनात येते. कारण इतक्या अटिपिकल मालिकेसाठी 'ते फायनली एकत्र येतात' हा शेवट एकदम टिपिकल वाटू शकतो. फ्लीबॅगचा पुढचा सीझन येणार नसल्याचं फीबी वॉलर-ब्रिजने अलीकडेच जाहीर केलं आहे. पण तिने प्रेमात पडलेल्या फ्लीबॅगला चितारण्यासाठी पुन्हा पेन हातात घ्यावं असं वाटतं खरं!

फीबी वॉलर-ब्रिजने कुठल्या धुंदीत ही व्यक्तिरेखा आणि ही मालिका लिहिली कोण जाणे, बट इट गिव्ह्ज यू हेल ऑफ अ किक! आणि फक्त फ्लीबॅगच नाही, तुम्ही इतरही पात्रांच्या - नकारात्मकसुद्धा - प्रेमात पडता. एकुणातच ही वेड्यावाकड्या माणसांची कथा आहे आणि ती तुम्हांला सरळसोट दृष्टी ठेवून बघताच येत नाही. उत्तम लेखन हे सोलून सोलून बारकावे दाखवतं, वाचणाऱ्याचं बोट धरून त्याला वेगवेगळ्या गुहांमधून फिरवून आणतं आणि गोंधळातही  पाडतं. फ्लीबॅग तुम्हांला १२ एपिसोड्समध्ये इतकं काही दाखवते आणि इतकं काही बोलते की तुम्ही ही मालिका पुन्हा पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. आणि एवढं करूनही तुम्ही या मुलीला चिमटीत पकडू शकत नाही हे तिचं मोठं यश आहे. भालचंद्र नेमाडेंचे शब्द उसने घ्यायचे झाले तर फ्लीबॅग 'सर्वमुक्त. हेमुक्त. तेमुक्त. रंगमुक्त.अंगमुक्त. मनमुक्त. संज्ञामुक्त. मुक्तीमुक्त' आहे.

'नेमाड्यांनी ह्या कादंबरीत सर्व 'स्व' ओतल्यावर त्यांची यापुढली पुस्तके काय नमुन्याची उतरणार कोण जाणे ही पापशंका. कोसला मागे ठेवून हे पाखरू उडाले आहे. आता ते कोण्या देशी जाऊन तिथल्ली वार्ता घेऊन येते ती ऐकायला मी फारफार उत्सुक आहे.' - हा 'कोसला वाचल्यानंतर' या लेखाचा शेवटचा परिच्छेद आहे. हा परिच्छेद फीबी वॉलर-ब्रिज आणि फ्लीबॅग ही दोन नावं टाकून मला बाकी जसाच्या तसा घ्यावासा वाटतो. अर्थात गूगल जगन्नियंता असल्याने फीबी वॉलर-ब्रिज पुढच्या बॉंडपटाची सहलेखिका आहे हे अनेकांना माहिती आहे. तर तिचा जेम्स बॉंड चेझ, अ‍ॅक्शन आणि सिडक्शनबरोबर ब्रोकन माइंड, व्हॅल्यू स्ट्रगल आणि फेमिनिझमच्याही काही लेयर्स ओपन करून दाखवतो का हे पाहायला मी फार फार उत्सुक आहे!

# Fleabag
# Amazon Prime

(फेसबुक पोस्ट)

Friday, October 19, 2018

There is something in Tumbbad

It rains. It rains incessantly throughout the movie. It rains so much that you yourself feel drenched while leaving the theater! Apart from the rain, what remains with you is that haunting sense of absurd, supernatural existence.  

Mystic tale at its finest, Tumbbad engages you right from it's first frame. The movie is not devoid of the flaws, and the flaws are quite conspicuous, but Tumbbad finally scores owing mainly to its absolutely magnificent filming. The makers must have fought an uphill battle while bringing Tumbbad live on the screen. It's not a small feat to create a bygone era filled with hundreds of minute details. Add to that the stylized touches and you are in for a thrill ride. (There is this amazingly old passenger vehicle that frequently drops Vinayak (Sohum Shah) at Tumbbad. As the vehicle approaches through rain and haze, I could not help recalling the images from Mad Max : Fury Road'!)

Tumbbad's success lies in creating a story replete with images that keep on haunting you the next day. Mystic stories instigate our innermost emotion of fear and in that sense, it could be argued that horror fantasy is an easy way to captivate the audience. But then the 'horror layer' is not everything. There is more to it. In fact, Tumbbad is not really a horror film. In this film, horror is not even a ghost. It's a deity. And the story demands the protagonist to go and visit horror instead of horror appearing in front of him out of nowhere. So you know where the 'horror lives'. And you also know that it is not movable. This is the premise that makes Tumbbad more interesting. It is the superhuman aspect of the story that keeps tickling your imagination. 

Marathi audiences would feel that Tumbbad could have been better in Marathi because it's completely rooted in Marathi, more specifically 'Marathi Brahmin' environment. It is evident that in view of reaching to a larger audience, it's made in Hindi. The language part does not create a major obstacle, but there are a few instances where I did feel 'Oh, why Hindi?'. But again, that must be because I am Marathi! 

There are a few noticeable loopholes though. For instance, it is hard to accept that city of Pune had telephones after a few years of independence, but did not have electricity. The overall 'excitement in the experience' gets little diluted through such hiccups, but frankly the flow is little more powerful than the flaw. 

Sohum Shah does a good job as a greedy, scheming man. His unstable, 'on-off'' relation with his son is also intriguing. Jyoti Malshe, Anita Date, Ronjini Chakraborty excel as the women trapped in patriarchal society. But the mysticism of Tumbbad hovers over the characters so strongly that it leaves little room for you to take note of them individually. 

Tumbbad ultimately belongs to the director Rahil Anil Barve, creative director Anand Gandhi and co-director Adesh Prasad. They are also the writers of the film (along with Mitesh Shah) and boy, what a wonderful piece they have written! Cinematographer Pankaj Kumar needs special, very special mention. The whole experience is shaped by his brilliance with the camera. 

Do watch Tumbbad. The gods are calling!

#Tumbbad
#Amazon Prime

(Facebook post)

Wednesday, October 11, 2017

सबस्टन्स, स्टाइल...सिनेमा!

हिंदी चित्रपटाला शंभर वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१३ साली 'बॉम्बे टॉकीज' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. करण जोहर, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप या चार दिग्दर्शकांच्या चार शॉर्ट फिल्म्स या चित्रपटात होत्या. सगळ्याच फिल्म्स चांगल्या होत्या (करण जोहरची फिल्मसुद्धा!), पण दिबाकर बॅनर्जीची फिल्म (स्टार) जादुई ताकदीची होती. सत्यजीत रे यांच्या कथेवर आधारित ही फिल्म होती. अभिनयाच्या क्षेत्रात अपयशी ठरलेला आणि आता नोकरी-धंदा शोधणारा पुरंदर नावाचा एक इसम (नवाजुद्दीन सिद्दीकी) रस्त्यात शूटिंग बघायला म्हणून थांबतो आणि त्याला अचानक एका मिनिटभराच्या रोलसाठी विचारणा होते. तो 'हो' म्हणतो. त्याला संवाद असा काही नसतो. नायक रस्त्यातून चाललाय आणि त्याला एका माणसाचा धक्का लागतो. तो माणूस म्हणजे पुरंदर. इतकंच. 'माझा डायलॉग काय?' असं पुरंदरने विचारल्यावर दिग्दर्शकाचा सहायक वैतागून त्याला एका कागदावर 'ऐ' असं लिहून देतो. या 'संवादाची प्रॅक्टिस' करायला पुरंदर लोकेशनजवळच्या एका मोकळ्या जागेत जातो तेव्हा तिथे त्याला भ्रम (hallucination) होतो आणि त्याचे नाटकाचे गुरु (सदाशिव अमरापूरकर) भेटतात. या दोघांचा जो संवाद होतो तो या फिल्मचा अर्क आहे. अभिनय, मग तो धक्का लागला म्हणून साधं 'ऐ' म्हणण्याचा असला तरी, गंभीरपणे घ्यायची गोष्ट आहे असं सुचवत पुरंदरच्या निष्क्रिय, चंचल स्वभावावर त्याचा हा एकेकाळचा गुरु नेमकं बोट ठेवतो.

या लहानशा फिल्मच्या प्रभावातून मी आजवर बाहेर आलेलो नाही. दिबाकर बॅनर्जीच्या फिल्म्स मला अतिशय आवडतात आणि या शॉर्ट फिल्मने तर माझ्यावर विशेष गारूड केलं. या फिल्मबद्दल एकदा लिहिलंही होतं. पण मला याच चित्रपटातल्या अनुराग कश्यपच्या फिल्मबद्दल (मुरब्बा) जे वाटलं; किंबहुना या फिल्ममुळे माझ्या मनात जो गोंधळ / संघर्ष उभा राहिला त्याबद्दल लिहायचं आहे. अमिताभ बच्चनचा आज वाढदिवस आहे आणि तोही धागा इथे जुळलेला आहे. खरं तर तो एक मुख्य ट्रिगर आहे.

उत्तर प्रदेशातील एक तरुण त्याच्या आजारी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुंबईला येतो. त्याला अमिताभला भेटायचं आहे आणि वडिलांनी दिलेला 'मुरब्बा' अमिताभला खाऊ घालायचा आहे. अनेक सायास करून तो अखेरीस अमिताभला पाच मिनिटं भेटतो, त्याला आपल्या डोळ्यांसमोर मुरब्बा खाताना बघतो आणि मग परत आपल्या गावी जातो. अशी ही कथा. आता कथेत एक गमतीदार ट्विस्ट आहे, पण ते इथे सांगण्याचं काही प्रयोजन नाही.

ही फिल्म पहिल्यांदा पाहिली तेव्हा मला एकदम वाटलं की अनुराग कश्यपने अमिताभ बच्चनभोवती फिल्म का केली असेल? कारण दिग्दर्शक म्हणून त्याची प्रकृती वेगळी आहे. खरं तर 'बॉम्बे टॉकीज' मधली दिबाकर बॅनर्जीची फिल्म 'सिनेमा आणि सामान्य माणूस' या चित्रपटाच्या मुख्य थीमला सर्वाधिक न्याय देणारी होती. इतर फिल्म्समध्येही सिनेमाचा संदर्भ अर्थातच होता, परंतु दिबाकर बॅनर्जीने 'सिनेमा' या कलेविषयी (त्यातल्या अभिनय या एका प्रमुख अंगाविषयी) काही मूलभूत सांगायचा प्रयत्न केला होता. इतर फिल्म्समध्ये 'सिनेमाचा प्रभाव' आणि त्यातून तयार झालेली गोष्ट हा मुख्य आशय होता. अनुराग कश्यपच्या फिल्ममध्ये सिनेमापेक्षाही 'अमिताभ बच्चनचा प्रभाव' हा मुख्य आशय होता. त्यामुळे दिबाकर बॅनर्जीने जसं सिनेमाकडे एका व्यापक दृष्टीने बघत फिल्म केली तशी अनुराग कश्यपने का नाही केली असा मला प्रश्न पडला होता. दुसरं म्हणजे एखाद्या अभिनेत्याला भेटायला गर्दी करणारे, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या आकंठ प्रेमात असलेले लोक गंडलेले असतात असं माझं मत होतं. अजूनही आहे. शिवाय या सुपरस्टार प्रकरणामुळे चांगले, अर्थपूर्ण चित्रपट दुर्लक्षित राहतात असंही वाटतं. पण ही फिल्म मी दुसऱ्यांदा पाहिली तेव्हा मला काहीतरी वेगळं वाटलं. कदाचित मी त्या फिल्मकडे माझ्या अपेक्षांच्या चौकटीत न बघता त्या तरुणाच्या नजरेतून पाहिल्यामुळे असेल, पण मी बच्चन क्रेझ एन्जॉय करू शकलो. (माणसं अतार्किक का वागतात हा प्रश्न बरेचदा गैरलागू असतो. ती अतार्किक वागतात इतकंच खरं असतं.) फिल्मचा नायक अमिताभला भेटतो तो सीन अनुराग कश्यपने लक्षणीय पद्धतीने शूट केला आहे. नायक सिक्युरिटी गार्डशी वाद घालतोय. गार्ड त्याला आत सोडत नाहीये. आतून अमिताभचा जानामाना धीरगंभीर आवाज ऐकू येतो. गार्ड नायकाला आत सोडतो. नायकाच्या चेहऱ्यावर इच्छापूर्तीचा आणि अमिताभ दर्शनाचा आनंद. त्या क्षणी पार्श्वभूमीवर अमिताभचे प्रसिद्ध डायलॉग्ज ऐकू येतात. ते नायकाच्या मनात उमटलेले आहेत. या सीनमधली मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे अमिताभची मुद्रा. शाल वगैरे गुंडाळून अमिताभ उभा आहे. दाढी, चष्मा नीट. आणि चेहऱ्यावर काहीसे त्रासिक भाव. ते भाव मला फार सूचक वाटले. जे चाललंय त्याच्याशी डिसकनेक्टेड असे भाव.

लहानपणापासून जे चित्रपट बघायला मिळाले त्यात प्रामुख्याने अमिताभ असल्याने आणि अमिताभ हा इंटेन्स अभिनेता असल्याने त्याच्या प्रभावातून मी स्वतःदेखील सुटू शकलो नव्हतो. अमिताभचा वावर, थिएट्रिक्स खिळवून ठेवणारं होतं. पण वेगळ्या वळणाचे हिंदी चित्रपट जास्त आवडत होते. आणि ते विशिष्ट अभिनेत्यांचे चित्रपट नव्हते. ते दिग्दर्शकांचे चित्रपट होते. अर्धसत्य म्हणजे गोविंद निहलानी, जुनून म्हणजे श्याम बेनेगल, शतरंज के खिलाडी म्हणजे सत्यजीत रे इथपासून परिंदा म्हणजे विधु विनोद चोप्रा, सत्या म्हणजे रामगोपाल वर्मा, हजारों ख्वाहिशें ऐसी म्हणजे सुधीर मिश्रा इथपर्यंतची साखळी तयार होत होती. पॉप्युलर आणि पॅरलल या दोन ढोबळ प्रवाहांचा विचार करताना मला 'स्टार' आणि 'मुरब्बा' या दोन फिल्म्स प्रातिनिधिक चित्र मांडणाऱ्या वाटतात.

कलात्मक निर्मिती एका बाजूला आहे आणि अनुभूती एका बाजूला आहे. मला 'पार्टी' हा चित्रपट बघताना जी अनुभूती येते ती 'अग्नीपथ' बघताना येणाऱ्या अनुभूतीहून वेगळी असते. 'पार्टी' हा चित्रपट महत्त्वाचं काही बोलतो, पण 'अग्नीपथ' मधलं प्युअर थिएट्रिक्स महत्त्वाचं काही बोलत नसतानाही आकर्षित करू शकतं. मध्यंतरी कुठेतरी वाचलेलं एक आठवतं - A film is - or should be - more like music than like fiction. It should be a progression of moods and feelings. The theme, what's behind the emotion, the meaning, all that comes later. यातील विचार कदाचित डिबेटेबल असू शकेल, पण सिनेमाचा विचार करताना मला स्वतःला हे अगदी पटलेलं आहे.

मला फिल्म म्हणून अजूनही 'स्टार'च आवडते, पण 'अमिताभकेंद्री' फिल्म कशाला हे जे आधी वाटत होतं ते वाटेनासं झालं. एक जाणवलं की सिनेमा ही एक भलीमोठी स्पेस आहे. तिथे काय होईल, काय आकाराला येईल हे ठरवणं अवघड आहे. तिथल्या 'इमोशनल आउटपुट'ला एका साच्यात बांधता येणार नाही. या स्पेसमध्ये जे निर्माण होतं ते माणसांच्या मनातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करतं. यातला एक कोपरा, जो भारतीय संदर्भात तरी डॉमिनंट आहे तो म्हणजे नाट्यमयता आणि मेलोड्रामा. अमिताभ या आघाडीवर निःसंशय ग्रेट होता. बौद्धिक स्टिम्युलेशनइतकंच ड्रॅमॅटिक स्टिम्युलेशन माणसांना प्रभावित करतं हे नाकारता येत नाही. म्हणूनच अमिताभ बच्चन हे प्रकरण लार्जर दॅन लाइफ कसं झालं या प्रश्नात न अडकता अमिताभ हे लार्जर दॅन लाइफ प्रकरण आहे हे स्वीकारुन टाकावं.

प्रतिभावंत लेखक-दिग्दर्शकांचे चित्रपट खोल परिणाम करतात. अगदी मनामध्ये एक नवीन स्तर निर्माण करतात. पण असं असलं तरी 'विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम' हा डायलॉग ऐकून आपल्याला शिट्टी का मारावीशी वाटते हे मला कळत नाही. आपल्याला 'सबस्टन्स' इतकीच 'स्टाईल' का आवडते? हा बहुधा आर्टिस्टिक क्रायसिस किंवा आयडेंटिटी क्रायसिस असावा!

(फेसबुक पोस्ट)

Saturday, May 16, 2015

सिनेमा : आवड आणि अवधान

'कितने आदमी थे' हा एक गहन प्रश्न आहे. कुठल्याही चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवशी सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न हाच असेल! अर्थात इतर प्रेक्षकांसारखाच मला हा प्रश्न माहीत आहे तो 'शोले'मुळे. आता 'शोले' हा चित्रपट तुम्हाला आवडतो की आवडत नाही याला महत्त्व नसतं. 'शोले' तुम्हाला टाळता येत नाही एवढंच खरं असतं. सिनेमा या प्रकरणाबाबत माझं काहीसं असंच होत असावं. 

लेखन, अभिनय, संगीत, दृश्य मांडणी या सगळ्याच्या अफलातून एकत्रीकरणातून निर्माण होणारं रसायन म्हणजे सिनेमा. अफलातून अशासाठी की इथे संगीत नुसतं संगीत म्हणून न येता प्रसंगाला पूरक म्हणून यावं लागतं. लेखक शब्दांचं बांधकाम तर करतोच, पण लेखकाच्या डोळ्यासमोर शब्दांच्या आधी पात्रं आणि प्रसंग यावे लागतात. कथा महत्त्वाची असतेच, पण पटकथा तिच्याहूनही वरचढ ठरू शकते. अर्थात हे सगळं चांगल्या सिनेमांना लागू होतं. एरवी कशाचा कशाशी काहीही संबंध नसलेले चित्रपट तयार होतच असतात! सिनेमाशी माझं नातं तयार होण्याच्या आणि टिकण्याच्या मुळाशी चांगले चित्रपट आहेत, पण 'गोष्ट अनुभवण्या'ची ऊर्मी हे अर्थातच खरं कारण आहे. 'ड्रामा' हा मनुष्याच्या स्थायीभावाला आकर्षित करणारा प्रकार आहे खरा!  

शाळा आणि कॉलेजच्या दिवसात आशय आणि मांडणीचा फारसा विचार न करता इमोशन आणि अ‍ॅक्शनच्या प्रेमात पडून पाहिलेल्या चित्रपटांपासून चिंतनशील चित्रपटदेखील असू शकतो याची खात्री पटवणाऱ्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास रंजक आहे. आणि यात भलतंच 'मिक्सिंग' आहे. अनेकजणांनी मिळून हे मिक्सिंग केलं आहे. म्हणजे 'अग्निपथ'च्या विजय दीनानाथ चौहान पासून 'कथा'मधल्या राजाराम पांडुरंग जोशीपर्यंत, विष्णुपंत पागनीसांच्या 'तुकारामा'पासून 'कमीन्या' चार्लीपर्यंत, 'अर्धसत्य'च्या अनंत वेलणकरपासून 'सत्या'च्या भिकू म्हात्रेपर्यंत, 'डेड पोएट्स सोसायटी'च्या जॉन कीटिंगपासून 'देअर विल बी ब्लड'च्या डॅनियल प्लेनव्ह्यूपर्यंत, 'स्कारफेस'च्या टोनी मोंटानापासून 'माय फ़ेअर लेडी'च्या हेन्री हिगिन्सपर्यंत, 'उंबरठा'च्या सुलभा महाजनपासून 'मिस लव्हली'च्या पिंकीपर्यंत, गुरुदत्तच्या 'प्यासा'पासून इम्तियाज अलीच्या 'रॉकस्टार'पर्यंत आणि सानेगुरुजींच्या श्यामपासून 'फँड्री'च्या जब्यापर्यंत! प्रत्येकाची एक गोष्ट आहे, प्रत्येकाचं सुख-दुःख आहे आणि समाजवास्तवाच्या भयचकित करणाऱ्या प्रवाहाच्या पार्श्वभूमीवर आपलं, म्हणजे प्रेक्षकांचं त्यांचं त्यांनाच दृश्यमान होणारं जगणं आहे. 

सिनेमाविषयी पुष्कळ बोललं जातं, बोलता येईल. पण मला विचार करताना नेहमी वाटतं की एक धागा या कलेशी कायम जोडलेला आहे आणि तो म्हणजे 'क्रिएटिव्ह टॅलंट'चा धागा. चांगला सिनेमा कुठल्याही विषयावरचा असला, त्या पात्रांची पार्श्वभूमी कोणतीही असली तरी तो 'चांगला' होतो या कलात्मक बुद्धिमत्तेमुळे. चित्रपट पाहणारा तो चित्रपट स्वतःबरोबर घरी नेतो तो याच कलात्मक बुद्धिमत्तेमुळे. आणि ही चित्रपटात जागोजागी दिसते. ती 'देव डी'च्या स्टायलाइज्ड निर्मितीत दिसते, 'ओंकारा' किंवा 'अब तक छप्पन' च्या भेदक संवादात दिसते, मराठीत अभावानेच दिसणाऱ्या 'फँड्री'च्या अचूक कास्टिंगमध्ये दिसते, 'एलएसडी', 'अग्ली'च्या खिळवून ठेवणाऱ्या बांधणीत दिसते, 'आंखो देखी' किंवा 'शिप ऑफ थिसियस'च्या समृद्ध जाणिवांमध्ये, सखोल चिंतनामध्ये दिसते - अगदी 'कजरारे'सारख्या गाण्याच्या योग्य प्लेसमेंटमध्येसुद्धा दिसते. मला प्रामाणिकपणे असंही वाटतं की कलात्मक बुद्धिमत्ता हा दुष्प्राप्यच प्रकार आहे. ती सहजी प्रसन्न होणारी गोष्ट नाही. त्यामुळे कुठल्याही कलेसारखीच इथेही गरजेची असते ती प्रतिभा आणि जोडीला अफाट  प्रयत्नांची साधना!

हिंदी, मराठी आणि इंग्लिशमधल्या अनेक प्रतिभावंत लेखक-दिग्दर्शकांनी हा आनंद दिला आहे. हिंदी आणि मराठीबाबत बोलायचं झालं तर आज चांगले चित्रपट चालण्याची जरी नाही तरी निर्माण होण्याची शक्यता खूप वाढली आहे हे आशादायक आहे. मुख्य म्हणजे लेखन, अभिनय आणि सादरीकरण या महत्त्वाच्या अंगांना न्याय देणाऱ्या चित्रपटांचं स्वागत होत आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र सिनेमा हे आधी होतं तितकं सोपं प्रकरण राहिलेलं नाही याची नोंद घेणं गरजेचं झालं आहे. आजचा सिनेमा हा निःशंक मनाने आस्वाद घ्यावा असा कलाप्रकार म्हणून मर्यादित राहिलेला नाही. सिनेमाचं कलात्मक निर्मिती म्हणून असलेलं एक रूप, त्याचं व्यवसाय म्हणून असलेलं आणखी एक वेगळं रूप, सिनेमाच्या अर्थकारणामागची काळी बाजू, सलमान खानसारख्या प्रकरणांमुळे संवेदनेवर बसणारे घाव, सिनेमाला आणि अभिनेत्यांना मिळत असलेलं अवास्तव महत्त्व, सिनेमा ही कला आहे - प्रत्यक्ष जगणं वेगळं आहे आणि आपल्याकडून कृतीची अपेक्षा करणारं आहे याचा पडणारा विसर अशा अनेक गोष्टी सिनेमाकडे फक्त कला म्हणून न बघता समाजावर आघात करणारी गोष्ट म्हणून बघायला भाग पाडतायत. अशा वेळी वाटतं ते एकच - कला असो, व्यवसाय असो की आणखी काही असो, समाजाची सर्व अंगे मूल्यभान असलेल्यांच्या हातातच सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे सिनेमादेखील मूल्यभान असणाऱ्यांच्या हातातच राहावा ही सदिच्छा!       

(दिव्य मराठी, मधुरिमा)

Saturday, March 21, 2015

सिनेमा असा असतो!

दिबाकर बॅनर्जी हे नाव पहिल्यांदा ऐकलं ते 'खोसला का घोसला' या चित्रपटामुळे. दिल्लीतील एका सभ्य गृहस्थाची बिल्डरने केलेली फसवणूक आणि या गृहस्थाच्या मुलाने त्या बिल्डरला शिकवलेला धडा हे मध्यवर्ती सूत्र असलेला हा चित्रपट अनेकांना माहीत असेल. हिंदी चित्रपटात नव्या लाटेतील चित्रपटात अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, रजत कपूर यांच्यासह दिबाकर बॅनर्जी हे नाव ठळकपणे पुढे आलं ते 'ओये लकी लकी ओये', 'एलएसडी' आणि 'शांघाय' या त्याच्या चित्रपटांमुळे. हे सगळेच माझे आवडते चित्रपट असले तरी दिबाकर बॅनर्जीच्या एका छोट्या फिल्मने मात्र मला क्लीन बोल्ड केलं. ही फिल्म पाहिल्यावर येणारा अनुभव शब्दातीत होता. पंचवीस-तीस मिनिटांची ही फिल्म म्हणजे आशयघन चित्रपटनिर्मितीचा वस्तुपाठ आहे. 

भारतीय चित्रपटाला शंभर वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१३ साली बॉम्बे टॉकीज' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात करण जोहर, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप या चार दिग्दर्शकांनी केलेल्या चार शॉर्ट फिल्म्स आहेत. चारही फिल्ममध्ये एक समान सूत्र आहे आणि ते म्हणजे हिंदी सिनेमा. विविध सामाजिक स्तरातील व्यक्तींवर सिनेमाचा प्रभाव किंवा त्यांच्या आयुष्यातील सिनेमाशी जोडलेला एखादा धागा या फिल्म्समधून उलगडतो. 'बॉम्बे टॉकीज' चित्रपट म्हणून मला आवडला असला तरी एक गोष्ट मात्र माझ्या मनात राहिली. चित्रपटांचा समाजावरील प्रभाव वा व्यक्तींचं चित्रपटांशी जोडलेपण याबरोबरच चित्रपटांचा समाजावर नकारात्मक प्रभावदेखील आहे हे विसरता येत नाही. (इथे मला रायगड जिल्ह्यात गेली अनेक वर्षं विविध सामाजिक प्रश्नांवर संघटनात्मक कार्य करणाऱ्या उल्का महाजनांची आठवण होते. एका विषयासंदर्भात लिहिताना त्यांनी हिंदी चित्रपट हा एक फार मोठा प्रॉब्लेम असल्याचं म्हटलं आहे आणि त्यांच्या या म्हणण्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.) त्यामुळे सिनेमाची शंभर वर्षं सेलिब्रेट करताना इतर बाजूही लक्षात घ्याव्या लागतील. 

तर सध्याचा विषय दिबाकर बॅनर्जीची कथा. सत्यजित राय यांच्या एका लघुकथेवर आधारित हे रूपांतर आहे. या कथेत आपल्याला दिसतो तो पुरंदर (नवाजुद्दिन सिद्दिकी). मुंबईत आपल्या बायको-मुलीबरोबर राहणारा एक सामान्य माणूस. हा मूळचा सांगलीचा, थिएटर अभिनेता, पण त्यात यश न आलेला आणि आता संसाराच्या चक्रात अडकलेला. त्याची मुलगी आजारी आहे. तिला रोज एखादी गोष्ट सांगून हसवणं हे त्याचं एक मुख्य काम आहे. तो सकाळी घराबाहेर पडून एके ठिकाणी नोकरीसंदर्भात जातो, पण ती जागा आता रिकामी नाही. तो तिथून बाहेर पडतो आणि रस्त्यावर एक शूटिंग चाललंय तिथे घुटमळतो. 'चालताना हीरोचा धक्का लागतो तो माणूस' या दोन मिनिटांच्या शॉटसाठी त्याला विचारण्यात येतं आणि तो तयार होतो. धक्का लागल्यावर म्हणायच्या 'ऎ' या 'संवादा'ची रिहर्सल करण्यासाठी तो तिथल्याच मागच्या एका निवांत ठिकाणी जातो आणि तिथे या फिल्मचा हायलाईट प्रसंग घडतो. त्याच्या दिवास्वप्नात तो सांगलीतील त्याच्या थिएटर गुरूंशी (सदाशिव अमरापूरकर) बोलतो. या संवादातून पुरंदरमधला रिस्क न घेणारा, तळ्यात-मळ्यात करणारा, अभिनेता असलेला पण अभिनयकलेशी 'कमिटेड' नसलेला एक कलाकार आपल्याला दिसतो. 'ऎ' हा एकच शब्द असला तरी जेव्हा तो अभिनित करून म्हणायचा असतो तेव्हा त्यात मेहनत असते हे त्याचे गुरू त्याला सांगतात, त्याला प्रात्यक्षिक दाखवतात आणि नाहीसे होतात.  

पुरंदर शॉट देऊन घरी परततो आणि आपल्या मुलीला त्याचा शूटिंगचा अनुभव अभिनित करून दाखवतो. आणि इथे फिल्म संपते. 

कोणतीही कला आणि तिचा आविष्कार ही जाता जाता करायची गोष्ट नव्हे, ते 'मेहनती'चं काम आहे आणि चित्रपटातील चकाचौंध, ग्लॅमर याच्या पलीकडे चित्रपट निर्मिती, अभिनय ही मूलतः कलासाधना आहे, गांभीर्याने करायची गोष्ट आहे हे या छोट्याशा गोष्टीतून इतक्या प्रत्ययकारी पद्धतीनं समोर आलं आहे की आपण ते बघताना स्तिमित होतो. एकीकडे अभिनयातील मेहनतीबाबत आग्रही असणारे गुरू आणि त्यांचा हा अस्थिर वृत्तीचा, तुकड्या तुकड्यात आयुष्य जगणारा शिष्य यांच्यातील जुगलबंदी तर खिळवून ठेवणारी आहेच, पण संपूर्ण फिल्मची बांधणी करताना दिबाकर बॅनर्जीने जे बारकावे टिपले आहेत त्याला तोड नाही. दोन दोन मिनिटांच्या भूमिकेतील पात्रांच्या निवडीतील आणि त्यांच्याकडून अभिनय करून घेण्यातील 'मेहनत' या फिल्ममध्ये दिसते.

काही चित्रपट किंवा कधीकधी एखाद्या चित्रपटांतील एखादा प्रसंग, एखाद्या पात्राचा अभिनय कलात्मक आविष्काराची उंची गाठणारा नमुना म्हणून लक्षात राहतो. दिबाकर बॅनर्जीची ही फिल्म याच प्रकारात मोडते. फिल्ममध्ये सदाशिव अमरापूरकर 'कुणी घर देता का घर?' म्हणताना जो स्वर लावतात त्याने अंगावर काटा येतो आणि 'नाटक असं असतं' म्हणणारा नटसम्राट आठवतो. सगळी व्यवासायिक गणितं, पब्लिक डिमांड आणि सुमारसद्दीच्या पलीकडे जाऊन 'सिनेमा असा असतो' म्हणायला लावणारी ही फिल्म आवर्जून बघावी अशी आहे!

(दिव्य मराठी, मधुरिमा)